नाशिक:- कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटीआडगाव नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. काल झालेल्या पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण झालेला नाही. सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही. त्यामुळे नाशिककरांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.MARATHI SAHITYA SAMMELAN
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील मुख्य सभामंडपाच्या कामाची, किचन, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रूमची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संमेलन समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, दिलीप खैरे, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सारस्वतांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी ही पूर्णपणे सजली आहे. पावसाचे वातावरण जरी असले तरी संपूर्ण काळजी घेत संमेलनाच्या सर्व कार्यक्रमाची अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. हे संपूर्ण नाशिककरांचे संमेलन असून नाशिकचं नाव जागतिक पातळीवर पोहचण्यासाठी आपण या संमेलनाच्या नियोजनात कुठलीही उणीव भासणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पावसामुळे संमेलनाच्या कुठल्याही कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही. नाशिककरांना विनंती आहे की, नाशिकमध्ये देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे उचित स्वागत करा असे सांगत नाशिककरांनी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी येऊन या अभूतपूर्व संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. संमेलनासाठी सर्व नागरिकांना प्रवेश खुला असून सर्व सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.MARATHI SAHITYA SAMMELAN