नाशिकमध्ये किसान परिषदेचे आयोजन
शेतकरी आंदोलनावर ठाम, आता धरणे, रेलरोको आंदोलन
सरकारला दिली दोन दिवसांची मुदत
परिषदेत राजकीय मंडळीच्या सहभागावर आक्षेप
नाशिक : राज्यातील शेतकरी संपाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये झालेल्या किसान परिषदेत शेतकऱ्यानी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत आंदोलन अजून मोठे करत राष्ट्रव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात १२ जूनला राज्यात तहसील आणि जिल्ह्याधिकारी कार्यालयांना धरणे देण्यात येणार आहेत. तर १३ जूनला सर्वत्र चक्काजाम, रेलरोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी परिषदेच्या मंचावर सरकारमध्ये सामील असलेले खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडू, तर कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप व्यासपीठावर कसे असा प्रश्न करत एका महिला कार्यकर्तीने व्यासपीठावर माईकचा ताबा घेतला. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडला होता.
शेतकरी वर्गाने ऐतिहासिक संप पुरल्यानंतर त्यात फुट पडली. गुरुवारी काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरू झाले. मात्र अद्यापही शेतकऱ्याचा एक गट संपावर ठाम आहे. याच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमधील तूपसाखरे लॉन्सवर सर्व शेतकरी संघटनांची परिषद पार पडली. सुरुवातीला सुकाणू समितीची बैठक झाली त्यानंतर परिषद झाली.
सुकाणू समितीची बैठक
नव्याने स्थापन झालेल्या सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी सुरुवातीलाच शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुकाणू समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर १२ जून रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या तर १३ जूनला राज्यव्यापी चक्काजाम, रेलरोको करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास अशाप्रकारे आंदोलने अधिक तीव्र करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, शेकाप नेते जयंत पाटील, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हजर होते.
महिलेने घेतला माईकचा ताबा
परिषदेच्या सुरुवात व्यासपीठावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी, आमदार बच्चु कडू, कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप, रघुनाथदादा पाटील यांच्यासह अनेक नेते परिषदेला हजर होते होते. त्याचवेळी कल्पना इनामदार या कार्यकर्तीने व्यासपीठावर जाऊन दोन मिनीटे बोलायचे आहे असे सांगून माईक ताब्यात घेतला. शेतकरी संप राजकीय पक्षांच्या विरहीत असल्याचे सांगितले जात असताना व्यासपीठावर सरकारात सहभागी असलेले राजू शेट्टी आमदार बच्चुभाई कडू कसे असा प्रश्न सदर महिलेने विचारताच गोंधळाला सुरूवात झाली. त्यानंतर कॉ.राजू देसले यांनी महिलेच्या समोरील माईक हटवून घेतला आणि तातडीने कार्यकर्त्यांनी या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलीसही तत्काळ व्यासपीठावर गेले. त्यांनी त्या महिलेला सभागृहातून बाहेर आणले. यावेळी त्या महिलेने मुंबईहून आल्याचे आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असून कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसल्याचे सांगितले.